मंगळवार, २५ जून, २०२४

 भगवान गौतम बुद्ध हे भारतीय परंपरेतील अत्यंत महत्वाचे आणि कदाचित सर्वाधिक यशस्वी तत्त्ववेत्ते आहेत.


गौतम बुद्धांचा उदय, बुद्धमताचा विकास व प्रसार हे भारतीय सांस्कृतिक इतिहासातील एक सोन्याचे पान आहे.


सुजलाम सुफलाम भारतीय भूमी ही नेहमीच प्राचीन मानवाला आकर्षित करायची. पन्नास साठ हजार वर्षांपूर्वी एक काळ तर असा होता की जगातील बहुसंख्य मानव वंश ह्याच उपखंडात नांदत होता. शेतीचा शोध आणि स्थिर समाजाची स्थापना जगभर ज्या ज्या ठिकाणी झाली, त्यात भारतीय भूमीचे स्थान फार महत्वाचे आहे. 


आज आपल्याला सिंधू संस्कृती बऱ्यापैकी ज्ञात आहे पण खरंतर ती सरस्वतीची संस्कृती होती. सिंधू खोऱ्यातील त्या संस्कृतीची केंद्र ही बहुदा तिची पश्चिम सीमा होती. ज्या सात नद्यांचा उल्लेख सतत केला जातो त्या कदाचित सरस्वतीच्या उपनद्या होत्या. ही संस्कृती देखील एकटी नव्हती आणि अचानक निर्माण झालेली नव्हती. एका अनामिक उज्वल संस्कृतीतुन ती  उदयाला आली आणि पुढे तिने वैदिक संस्कृतीला जन्म दिला. त्या संस्कृतीला आणि लोकांना आपण सोयीसाठी वैदिक म्हणतो, मात्र तेही अनेक प्रकारची मतं, तत्व आणि आचारविचार पाळणारी लोकं असावीत. त्यांच्या आयुष्याला, इतिहासाला आणि भविष्यालाही अनेक शेडस असाव्यात. ऋग्वेदातील दाशराज्ञ युद्धाच्या वर्णनात ह्या संदर्भातील एक महत्वाचा उल्लेख सापडतो, पण त्याबद्दल नंतर कधीतरी..


तर असा हा भारत आणि भारतीय समाज सतत बदलत जाणाऱ्या आणि उन्नत होणाऱ्या विचारांचा आणि तत्वांचा प्रदेश होता व आहे. बौद्ध मत हा त्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा आहे. 


गौतम बौद्ध ह्याच भूमीत जन्माला आले. परदुःखाने विव्हळ होणारे त्यांचे मन इथल्याच भूमीत घडले. त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी इथल्याच ज्ञानात आणि तत्वज्ञानात शोधली. जिथे त्यांना हे ज्ञान कमी आणि अपुरे वाटले, तिथे त्यांनी स्वतःच्या प्राज्ञेने त्यात भर घातली, ते अजून समृद्ध केले. ते सिद्धार्थाचे बुद्ध झाले आणि भारतीय मातीतले हे ज्ञान त्यांनी जगभर पसरवले. गौतम बुद्ध हे भारतीय संस्कृतीचे सगळ्यात मोठे राजदूत ठरले. 


अनेकांना वाटतं की काळाच्या ओघात बौद्ध विचार भारतातून नाहीसे झाले, मात्र हा एक भ्रम आहे. कदाचित बौद्ध मतातील काही कर्मकांडाचे आचरण भारतात थांबले असेल मात्र गौतम बुद्धांचा विचार सतत जिवंत राहिला. त्यांच्या विचारांतील दया, क्षमा, करुणा भारतीय भक्ती परंपरेत वाहत्या राहिल्या. पंचशील हा भारतीय समाजाच्या नैतिकतेचा आधार झाला. भारतीय समाज आज जो धर्म पाळतो त्याला रूढार्थाने हिंदू म्हटले जाते मात्र त्याचा पाया जसा वेदांत आणि उपनिषदांत आहे तसाच बौद्धांच्या करुणेत आणि जैनांच्या अहिंसेतही आहे. 


भारतीय समाजाने उत्तम ते सारे घेतले, त्यातही जेंव्हा दोष निर्माण झाले तेंव्हा त्या दोषांना दूर करण्यासाठी वेळोवेळी बोधिसत्व जन्माला आले.


भारतीय संस्कृती आणि भारतीय विचार अमर आहेत कारण बुद्ध आणि बोधिसत्व अमर असतात.


-शैलेंद्र कवाडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा