मंगळवार, २५ जून, २०२४

 भैरप्पांची पर्व ही कादंबरी वाचतांना मोहून जायला होतं.


महाभारत ह्या ऐतिहासिक ग्रंथावर काळाने चढवलेला वर्ख दूर करून, कुरु वंशाचा इतिहास त्यांनी कादंबरीच्या स्वरूपात मांडला. मात्र सत्याच्या जवळ जाणाऱ्या ह्या कादंबरीतही त्या काळात मान्य असलेली अनेक गृहीतके त्यांनी सांभाळली होती. त्यातलं सगळ्यात मोठं गृहीतक होतं, आर्य आणि वैदिक संस्कृती बाहेरून आलेली आहे हे..


सत्तरच्या दशकाच्या शेवटी भैरप्पानी ही कादंबरी लिहिली. त्या आधी कित्येक वर्ष ते ह्या विषयावर संशोधन करत होते. त्याच्या जरा आधी, पन्नाशीच्या दशकात पुरातत्ववेत्ते बी बी लाल महाभारतात वर्णन केलेल्या ठिकाणांचे उत्खनन करत होते. तिथे सापडलेल्या वस्तूंवरून महाभारतातील घटनांचे वय ठरवत होते. त्यानंतर काही काळाने, भूगोलात हरवलेल्या पण इतिहासात आणि स्मृतीत जिवंत राहिलेल्या सरस्वती नदीचा वेध घेण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. जसजशी सॅटेलाईट इमेजरी जास्त प्रगत होत गेली तसतशी सरस्वती आणि सरस्वतीच्या काठावर फुललेली संस्कृती नव्याने सापडत गेली.


त्या नंतरच्या काळात अनेक पुरातत्व विद्वानांनी ऋग्वेदाचा आणि त्यातील भौगोलिक व ऐतिहासिक वर्णनांचा नव्याने अभ्यास सुरू केला. हे करत असताना एक गंमत लक्षात येत गेली, ती म्हणजे सिंधू सरस्वती संस्कृती आणि ऋग्वेदाचा काळ एकमेकांत सरमिसळ होतोय. थोडक्यात सिंधू सरस्वती संस्कृती हीच तथाकथित आर्य किंवा वैदिक संस्कृती होती. ह्या गोष्टींची साक्ष प्राचीन भारतीय साहित्यात तर आहेच पण जमिनीत दडून असलेल्या प्राचीन खापरांच्या तुकड्यांमध्ये, घोड्यांच्या, उंटांच्या आणि बैलांच्या लहान लहान खेळण्यांमध्येही आहे. 


भारतातील अनेक गोष्टींसारखाच आपल्या भौगोलिक व तात्विक इतिहासाचा शोधही ब्रिटिशांनीच लावला. भारतीय वाङ्मयाचा परिचय जसजसा त्यांना होत गेला तसे त्यांच्या लक्षात येत गेले की आज विपन्नावस्थेत असलेल्या ह्या लोकांची संस्कृती प्राचीन ग्रीक संस्कृतीपेक्षाही जास्त उन्नत, जास्त मानवीय होती. त्यांना हेही लक्षात आले की भाषेचा आणि ज्ञानाचा एक समान धागा आहे, जो पूर्वेला भारतात उगम पावतो आणि थेट ग्रीसपर्यंत जातो. ग्रीक संस्कृतीला सगळ्या युरोपियन संस्कृतीचे जन्मस्थळ समजले जाते आणि म्हणूनच भारताचे ग्रीसशी असलेले हे नाते ब्रिटिशांना थक्क करून गेले. त्यांची पहिली प्रतिक्रिया नकाराची होती.


आर्यांच्या आक्रमणाचा, आगमनाचा सिद्धांत ह्याच नकारातून रचला गेला. तो इतका पक्का मांडला गेला की लोकमान्य टिळकांसारख्या स्वदेशीच्या कट्टर पुरस्कर्त्यांने वेदांचे जन्मस्थान आर्क्टिक प्रदेशात नेऊन ठेवले. भारतातच सोडा, पण भारताबाहेर घडलेल्या काही ऐतिहासिक घटनांचे क्रम बदलले गेले. थोडक्यात वेदांमधील ऐतिहासिक वर्णन, उपनिषदांमधील तत्वज्ञान आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सापडलेल्या सिंधू संस्कृतीचा संबंध तोडला गेला.


आता हळूहळू लक्षात येतेय की ऋग्वेद इथेच सरस्वतीच्या खोऱ्यात रचला गेला, सरस्वती आटत गेली तसे तिच्या काठी राहणारे लोक पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे सरकत गेले. मोहंजदरो आणि हडप्पा त्या पश्चिमेकडे सरकलेल्या लोकांनी वसवले, रामायण आणि महाभारत काळात हेच लोक हळूहळू गंगा यमुनेच्या खोऱ्यात सरकत गेले. भगीरथ हा कदाचित गंगेच्या खोऱ्यात तिचा उगम शोधत गेलेला पहिला राजा असावा. 


थोडक्यात आज भैरप्पा तरुण असते तर त्यांनी पर्व फार वेगळ्या पद्धतीने लिहिली असती. तिच्यात सिनौलीमध्ये सापडलेल्या रथांचे उल्लेख असते, सिंधू संस्कृतीत सापडलेल्या दाढीवाल्या पुजाऱ्याची गोष्ट असती, त्याही काळात प्रचलित असलेल्या नमस्कार मुद्रेचे आणि सागरी व्यापाराचे प्रकरण असते. रंगवलेल्या मातीच्या खापरांचे आणि मण्यांच्या कारखान्याचे वर्णन असते. पक्क्या विटांचे बांधकाम सोडून लाकडाचे, लाक्षागृह वाटावे असे बांधकाम करण्याचे कारणही त्यांनी लिहिले असते.


जमिनीत, ग्रंथांत, भूगोलात आणि इतिहासात दडलेले सत्य हळूहळू बाहेर येत जाईल. महाभारत नावाच्या इतिहासाची आपल्याला नवीन ओळखही होईल, पण त्याच बरोबर त्या इतिहासाला तर्काच्या धाग्यात ओवून एखादी जिवंत रसरशीत गोष्टही सांगितली जाईल.


फक्त आपण ती मोकळ्या मनाने ऐकली पाहिजे आणि त्यासाठी सांगणाराही भैरप्पांच्या ताकदीचा असला पाहिजे..


-शैलेंद्र कवाडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा