बहुतेक ते 1986 किंवा 87 चे वर्ष असावे.
मी अकरा बारा वर्षांचा होतो आणि एकटा दुकानावर बसायला सुरवात करून एखादे वर्ष झाले असावे. सकाळी जरा वेळ दुकान आणि मग 12 वाजता शाळा असा प्रोग्रॅम असायचा.
मला अजून आठवतंय, ते सरत्या पावसाळ्याचे दिवस होते. मी दुकानाच्या गल्ल्यातून दोन रुपयांची एक नोट चोरली. त्या नोटेचे काय करायचे ते मला पक्के माहीत होते.
ज्या गंधाच्या मोहात पडून मी आयुष्यातील पहिली चोरी केली होती, तो गंध मला आजही आठवतो. एकीकडे बटाटे उकडत आहेत, दुसरीकडे उकडलेल्या बटाट्याची सालं काढून त्यात लसूण, हळद, मीठ आणि मिरची लाकडी दांड्याने ठेचली जात आहे, बाजूला एक रगडा फिरतोय आणि दलियाची ताजी चटणी त्यात वाटली जातेय. मोठ्या स्टोव्हवर तेलात वडे सुटले आहेत आणि एकेक घाणा बाहेर येतोय. मधूनच पाऊस पडतोय आणि खड्ड्यात साठलेल्या पाण्यावर रिक्षातून गळलेले ऑइल तरंगते आहे. ह्या सगळ्या गंधांचे कोलाज तयार होऊन ते आसमंत भारून टाकते आहे. ही सगळी जादू सव्वा रुपयांत मिळायची.
एका बारा वर्षाच्या मुलासाठी दोन रुपये चोरायला हे कारण पुरेसे होते.
डोंबिवलीत मंजुनाथ हायस्कूल समोर एक जानकी हॉटेल होते, त्याच्या शेजारी त्याच नावाचा एक स्नॅक्स बार होता. नंतर त्याचे नाव दीपा स्नॅक्स बार झाले. वर वर्णन केलेलं सगळं तिथे घडायचं. हा मी एकट्याने खाल्लेला पहिला वडा आणि पाव. आयुष्यभर सुरू राहिलेल्या खाद्यप्रवासाचा हा श्रीगणेशा.
नव्वदीचे शतक सुरू झाले तेंव्हाच मी दहावी झालो. कॉलेज सुरू झाले आणि त्याच बरोबर माझ्या खाद्य यात्रेतील नवीन तिर्थस्थळ मला सापडत गेली.
वय वाढत गेलं तसा मी जास्त स्वतंत्र होत गेलो. दुकान आणि दुकानाचा गल्ला पूर्णपणे माझ्या ताब्यात आला. सुदैवाने वेगवेगळे पदार्थ खाण्याची आवड इतकी होती की त्या वयात इतर कोणत्याच सवयी लागल्या नाहीत. एका अर्थी खाण्याच्या आवडीने मला वाचवलं.
कॉलेजच्या बाहेर शांतारामची सरबताची गाडी असायची. त्या गाडीवर डबल लेमन सरबत पिणे ही माझी नशा होती. गम्मत फक्त सरबताच्या चवीत नसायची, खरी गंमत शांताराम ते सरबत कसे बनवतो ते बघण्यात होती. तो ओळीत बारा पंधरा ग्लास लावायचा. मग सगळ्यांमध्ये बर्फ़ाचा चुरा भरायचा. मग मीठ, त्यानंतर लिंबू, मग साखरेचे पाणी, ज्यांचा कालाखट्टा वगैरे आहे त्यांचे ते फ्लेवर. काही ग्लासमध्ये सब्जाचे बी. मग तो एक रिकामा ग्लास घ्यायचा, तो ग्लास उलटा करून प्रत्येक ग्लासवर ठेवायचा आणि हातात उचलून जोरात हलवायचा. कधी गर्दी जास्त असेल तर हेच दोन्ही हातांनी करायचा. फेसाळलेल्या सरबताचा ग्लास आमच्या समोर धरायचा. त्याच्या तल्लीन कष्टांची चव आमच्या जिभेवर रेंगाळत राहायची.
शांताराम हा मी पाहिलेला आद्य बारटेंडर..
कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये ब्रेड पॅटिस हा पदार्थ फेमस होता. गरमागरम ब्रेड पॅटिस आणि चटणी आवडायची. कॉलेजसमोर MIDC कॅन्टीन होते. प्रोफेश्वर आणि विद्यार्थी तिथे अग्निहोत्र करायला जायचे. तिथेही कोणता तरी पदार्थ फेमस होता पण आता मला तो नक्की आठवत नाही. बहुदा पट्टीचा समोसा.
सकाळी किंवा दुपारच्या वेळी मला आवडणारा अजून एक पदार्थ होता. चार रस्त्यावरून जरा पुढे गेलं की माय होम नावाचे हॉटेल होते. त्याच्याकडे स्टीम इडली मिळायची. त्या इडली बरोबर नारळाची चटणी असायची. पाच रुपये प्लेट. मी दोन प्लेट तरी खायचोच. तिथेच बाजूला एक गुरुदेव नावाचे हॉटेल होते. त्याच्याकडे मी मेंदूवडा सांबार खायचो, त्या सांबार मध्ये खोबऱ्याचे उभे काप असायचे. ते मुरलेले खोबरे चघळायला मजा यायची.
स्टेशनजवळ "चांदोले" म्हणून एक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दुकान होते. त्याच्या समोरच्या जागेत महाबळ नावाचा शेट्टी गाडी लावायचा. त्याच्याकडे मटण आणि चिकन अफलातून मिळायचे. त्याच्याच शेजारी एक भुर्जी पावची गाडी असायची. पावभाजीच्या दोन गाड्या असायच्या. ठाकुरच्या वडापावची गाडी असायची. ह्या प्रत्येक गाडीवाल्याची काहीतरी खासियत होती. एका ठिकाणी खाताना दुसऱ्या गाडीवर तयार होणाऱ्या पदार्थांचा गंध मनोसोक्त हुंगायचा आणि "उद्या येतो रे" असं त्याला मनातल्या मनात आश्वासन द्यायचं.
डोंबिवलीत माझी अजूनही खूप तीर्थक्षेत्र होती. नंतर शिकण्यासाठी मुंबईत जायला लागलो तर तिकडे अजून काही सापडली.
त्यांच्याबद्दल पुढच्या भागात..
-शैलेंद्र कवाडे.