जंगलात पाणवठे असतात,
ते कुणाची तहान भागवतात, कुणाची भूक भागवतात,
तहानलेली असोशी प्रत्येकाला असतेच, कुणाला पाणवठयातल्या पाण्याची, कुणाला रक्ताची,
म्हणूनच पाणवठा टाळता येतं नाही, पाणवठा जगावाच लागतो, बघावाच लागतो,
जगून किंवा मरून..
आयुष्यातही पाणवठे असतात..
काही नशिबात असलेले, काही मानसिक ओढीचे, काही ओढाळ भावनांचे, काही असह्य कर्तव्याचे,
काही असेच उगाचच.. झिंग देणारे..
ते पाणवठेही टाळता येत नाहीत, टाळावेसे वाटत नाहीत, टाळायला जमत नाहीत,
जगावेच लागतात,
डोके खाली घालुन तहान भागवून घेतांना, मानेत कराल सुळे खुपसले जातील, ही भीतीही जगून घ्यावी लागते, अनुभवून पहावी लागते,
कितीही टाळावीशी वाटली तरी..
मृगजळ समजून पाणवठा दूर करता येत नाही, सरोवर समजून पाणवठ्यात डुंबता येत नाही,
हळूहळू ही झिंग आवडायला लागते, हळूहळू भीती सवयीची होते, हळूहळू ह्या आव्हानांचीच झिंग येते,
गरुडाचे पंख, हत्तीची ताकद आणि गव्याची धमक येते, जगण्याची रंगत वाढते,
सगळं आयुष्य ह्या आव्हानांच्या कडेकडेन जगलं जातं, समृद्ध होतं,
कधीकधी आपणच कुणासाठी पाणवठा होतो..
रक्ताची तहान नसलेला, पाण्याचा अभाव नसलेला..
पण असा किंवा तसाही, पाणवठा टाळता येत नाही,
तो जगावाच लागतो..
-शैलेंद्र
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा