रविवार, २६ फेब्रुवारी, २०१७

नाना आणि तात्या, दोघ शेतकरी,

नानाच कुरण तसं जुनं, नानाचे बैल मस्त पोसलेले, नानाच गवत जोरात वाढायच, बैल चरून तुस्त व्हायचे..
तात्यांची जमीन खडकाळ, जागाही लहान, पण तात्यांकडे बोकड होते, ते बिचारे दिवसभर खुराने जमीन उकरत काही तरी खायचे, मधूनच एखादं झाड ओरबाडायचे, कधी नानाच्या शेतात घुसायचे, स्वतःच्याच लेंड्या शेतात जिरवून जमिनीचा कस वाढवायचे..

हळूहळू गम्मत व्हायला लागली, तात्यांचे काही बोकड कुठून काय खाऊन आले काय माहित, पण त्यांनी टाकलेल्या लेंड्यांमधून एक वेगळंच भगवं गवत उगवलं, सुसाट वाढायला लागलं, इतकं कि या बोकडानी कितीही खाल्लं तरी संपेना..तिकडे नानाच्या शेतावर आक्रीत घडलं, सारखं गवत काढून काढून जमीन थकली, त्यातच काही बैलांनी मस्ती करून गवत झोपवलं, ते गवत सीडलेस जातीचं, सिंचनाशिवाय, खताशिवाय ते परत येईना.. नानाचे बैल उपासमारीने मरतील कि काय, अशी वेळ आली.

पण नाना मोठा हुशार, धोरणी.. त्यांनी काय केलं, बैलांना एक शिट्टी शिकवली, शिट्टी मारली कि बैल परत येणार.. शिक्षण पूर्ण झाल्याची जशी खात्री झाली तशी त्याने ती शिट्टी तिजोरीत ठेवून दिली.. मग तो गेला तात्याकडे, बैठका झाल्या, अटी शर्ती झाल्या.. नानाचे बैल तात्यांच्या कुरणात सोडायचे, त्या बदल्यात बैलाच दूध तात्याने घ्यायचं आणि बैलाला वासरू झालं तेही तात्यांच्या मालकीचं, असा पक्का शब्द दिला गेला..

आता नानाचे बैल तात्यांच्या कुरणात मस्त चरतायेत, तात्यांचे बोकड  घाबरून कडेला बसलेत...

आणि तात्या बैलाला वासरू व्हायची आणि मग दूध काढायची स्वप्न बघतोय. नाना हळूच तिजोरीतल्या शिट्टीकडे बघून हसतोय..

आणि हो, या पोस्टचा राजकारणाशी अजिबात संबंध नाही.. निवडणुकांशी त्याहून नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा